Sunday, December 18, 2016


<|>** दर्शन **<|>



मुक्काम अलिबाग. स्थळ विठ्ठल मंदिर. संध्याकाळचे सात सव्वा सात वाजले असतील. आम्हि काहिजण गाभार्‍य़ात शिरलो.अजिबात गर्दी नव्हती तिथे. विठ्ठल रखुमाईच्या समोर हात जोडुन उभा राहिलो.डोळे मिटले.आता फक्त मी आणि ते दोघे..माझ्या जाणिवेत फक्त आम्हि तिघेच.खुप निवांत दर्शन घेतले त्या दोघांचे..डोळे भरुन अन डोळे मिटुन पण. आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी गाभार्‍य़ाबाहेरच्या मार्गाकडे वळलो.

मला कल्पना नव्हती कि केवळ माझ्या आयुष्यात येण्यासाठी देवाने एक विलक्षण क्षण प्रदक्षिणेच्या मार्गावर अगदी मुर्तिंच्या मागे ठेवला आहे म्हणुन.
जेमतेम 4-5 पावले चालुन मी उजवीकडे वळलो.आणि पाहिलं माझ्यापुढे असलेल्या आजीबाई बरोबर मुर्तिच्या मागच्या बाजुला उभ्या होत्या. मी गाभार्‍य़ात असताना त्यानी दर्शन घेतले व त्या बाहेर जाताना दिसल्या होत्या. कदाचित एखादी प्रदक्षिणा पूर्ण पण झाली असेल त्यांची. प्रदक्षिणा घालताना मी कितींदा तरी कित्येक जणाना पाहिले आहे. मुर्तीच्या मागे आल्यावर क़ुणी नाक घासते, क़ुणी कपाळ टेकविते..कुणी  दोन्ही हातांच्या बोटांनी तिथे स्पर्श करुन ती बोटे छातीला,गालाला लावतात.
आजीबाई एकीकडे तोंडाने काही स्तोत्र पुटपुटत होत्या. त्या ठिकाणी आल्यावर मात्र त्यानी क्षणभर बोलणे थांबवुन नमस्काराचे हात सोडुन ते वर करु भिंतिला लावले [जणु पलिकडल्या देवाला प्रेमाने जवळ घेतले] आणि चक्क एखाद्या लहान मुलाचा निरागसपणे मुका घ्यावा तसा त्या भिंतीचा मुका घेतला अन आपला गाल त्या भिंतीवर क्षणभर टेकवला.आणि ते पाहुन मी थरारलो.

त्यांची ती कृतिच इतकी गोड होती कि मला क्षणभर वाटले कि नातवासारखा बाल विठ्ठल त्यांच्या कुशीत आहे. त्याची आजी त्याचा अतिशय मायेने त्याचा मुका घेते आहे. दिवसभर कुठे क़ुठे गेला होतास..संध्याकाळचं घरी यावं, उगाच इकडे तिकडे फिरत बसु नये...असे अनेकदा सांगुन आज मात्र ते सर्व ऐकुन संध्याकाळचा घरी आलेला आपला नातु भेटावा त्या ओढीने त्यानी त्याचा मुका घेतला.

त्या क्षणापुरतं त्यानी बोलणं पण थांबवलं होतं.1-2 मिनिटात हे सर्व झाले असेल.पण मी मात्र त्या विठ्ठलाशी समरस झालेल्या आजीला पाहुन स्तिमित झालो.

किती अवघड गोष्ट आहे असा भाव देवाप्रत असणे..देव इतका आपला मानुन...मानुन नव्हेच तर आपलाच आहे या जाणिवेतुन त्याच्याशी इतके निर्व्याज समरस होता येणे...Total submission. आजीबाईनी खरच मला एका क्षणात सगुण आणि निर्गुण दर्शन दिले. तो [म्हणजे कोणितरी दूर असलेला] देव आणि मी त्याचा भक्त..देवळात येतो तेव्हा होते त्याची भेट..बाकि इतर वेळी तो त्याच्या कामात मी माझ्या. त्या देवाला आजीने आपलासा केला एका क्षणात. कदाचित त्यावेळी तिच्या समोर त्याची सगुण मुर्ति असेलही आणि निरलस प्रेमाचा तिच्या मनातला भक्तिचा झरा हे त्याचेच निर्गुण रुप असेल.

असतिल की त्यानाही काही व्यथा, दु:ख काळज्या..पण त्या क्षणी फक्त त्या माऊलीची माऊली होत्या. भक्ताच्या भावातला भगवंताचा क्षणभराचा भास मन मोहुन गेला. इथे खरं दर्शन झालं होतं मला. अन प्रत्यक्ष देव दिसुनही त्याच्या लेकरातली मायेची छ्टा मनावर अजुन तशीच रेंगाळत होती.

कळायला लागल्या पासुन देवळात जातोय,जसे संस्कार आहेत तसे त्याचे दर्शन घेतोय, जसा तो कळायला हवा तसा तो कसा कळेल याचे कधि विद्न्यान तर कधि भक्ति या द्वन्द्वात उत्तर शोधतोय.
पण आजीबाईनी त्या देवळात प्रदक्षिणा घालता घालता देवाच्या ‘मागे’ उभे राहुन जे दर्शन दिलय त्याने मी अवाक झालो.

नंतर मी विचार करु लागलो.कि हा प्रसंग असा सरळ आपल्या ह्रुदयाला का भिडावा. अध्यात्म अवघड खरच पण आपल्या परंपरेने जे आपल्याला दिलय ते अलौकिक आहे.अनेक प्रकारच्या साधना, अनेक मार्ग,पंथ. सर्व गोष्टिंचे वैचारिक स्वातंत्र्य देखिल.माना त्याला किवा नका मानु. पण तरीही साध्याच्या प्रेमात पडावे कि साधनेच्या....देव खरच असतो का, असेल तर जाणवतो का..कोणत्याही प्रकारचा किंतु मनी न येता फक्त त्याला आपला समजुन त्याच्याशी वागावे इतका साधा सोपा परमार्थ आज कृतित दिसला होता. नामदेव तुपाची वाटी घेऊन धावले होते माझ्याच मातीत,मुगल बादशहाला ही ज्याने मोहरा ओतताना दर्शन दिले माझ्याच मातीत...अशा अनेक प्रसंगांची नोंद आहे.मग आजच असे का वाटले..

जस जसा खोल उतरत गेलो तसे उत्तर सापडले. माझे माझ्या मातीशी असलेले नाते तुटले आहे. माझ्या इतिहासाबद्दल,अध्यात्मिक परंपरेबद्दल दुसरा कोण घेणार नाही इतक्या शंका मी घेतो आणि त्याला विद्न्यानाशी का कोण जाणे तोलत बसतो.
त्यामुळे असं आता कुणी असं देवावर प्रेम करेल हि शक्यताच बहुधा माझ्या मनाने गृहित धरली नव्ह्ती. सुदैव इतकंच की हा प्रसंग घडताना तो टिपण्याची बुद्धी [कि संवेदना] मला झाली.

एका भक्ताने आज निरलसपणे मला देवाच्या अस्तित्वाची जाणिव करुन दिली. खरच देव पाठिशी असावा असे आपल्याला नेहमीच वाटते..पण असा भक्त पाठिशी असावा असे मात्र देवाने ठरवुनच टाकले असावे. आजी, माहित नाही तुम्हि किती शिकलात ते, माहित नाही कुठे रहाता ते. फक्त एकच आज जाणतो तुम्ही देवाच्या घेतलेल्या मुक्याने माझ्या जाणिवा मात्र बोलक्या केल्यात. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.




Monday, August 22, 2016

MH01-B 2701

मै कहि कवी ना बन जाऊ...तेरे प्यार मे ए कविता...गाताना त्याची मस्त तंद्री लागली होती.आणि रात्री 9.30 ला आम्हि चोघे जण त्याचं गाणं ऐकण्यात रंगुन गेलो होतो.
झालं असं कि त्यादिवशी मी आणि दिलिप गेलो होतो एका कार्यक्रमाला..मुकेशची गाणी आणि रागदारी. पं अमरेंद्र धनेश्वर यांनी इतका सुंदर कार्यक्रम सादर केला कि 6 ते 8.30 वेळ कसा गेला ते कळले नाही.आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने मुकेशने पुन्हा एकदा आम्हाला झपाटुन टाकलं होतं.सोबत आणखी दोन सुरदास मित्र होते आमच्या. तेहि असेच हिंदी गाण्यांचे वेडे. दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमे समाई...भैरवीचे सुर अजुन मनात रेंगाळलेले होते आणी आम्हि यशवंतराव सेंटरच्या बाहेर आलो.
साधारण 9 वाजले असावेत. सी एस टी ला जायचं म्हणुन समोरुन जाणार्‍या एका टँक्सीला हात केला.आम्हि आत बसलो आणि टँक्सी निघाली. आमच्या गप्पा सुरु झाल्या,उजळणी सुरु झाली ऐकलेल्या गाण्यांची.अजुन मन भानावर यायला तयार नव्हते. आमचे बोलणे ऐकुन ड्रायव्हरने विचारले कि काहि प्रोग्राम होता का गाण्यांचा इथे? आम्हि त्याला सांगितले कि आज खास मुकेशच्या गाण्यांवर कार्यक्रम होता. मी सहज विचारले कि तुम्हाला पण जुनी गाणी आवडतात वाटते. तो म्हणाला कि मी गायचो हिंदी  गाणी.2-3 वर्षे झाली..गाणं थांबवलय. माझा स्वत:चा ऑर्कॆस्ट्रा होता.ग्रॅंट रोड ला भाटी म्युझिक सेंटर मध्ये मी शिकवायचो.क़िशोर,मुकेश,रफि सर्वांची गाणी कॅराओकेवर म्हणणारे माझे सोबती तिथे आजपण भेटतिल. खुपच मस्त वाटले ते ऐकुन.चौघांसोबत पाचवाहि वेडा निघाला.
गाडी सी एस टी च्या भुयारी मार्गाजवळ आली होती.साधारण 5 मिनिटांत आम्हि तिथे पोहोचणार होतो. ग़ाण्यांच्या गप्पांनी बहुधा त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतिल. आम्हि उतरलो,पैसे दिले. सिग्नल लाल असल्याने त्यालाहि थांबावं लागलं. आणि अचानक तो म्हणाला आप हिन्दि फिल्मि गीतोंके शौकिन हो..तो जाते जाते रफि साब का गाना सुनके जाइये.
त्याने गाणे सुरु केले. मै कहि कवी ना बन जाऊ...तेरे प्यार मे ए कविता. कल्पना करा.रात्री साडेनऊचा सुमार,सी एस टी स्टेशनसमोरचा लाल सिग्नल,मागे आणि बाजुला थांबलेल्या गाड्या.थोडिशी कमी झालेली गर्दि आणि ...आणि तो गातोय. तुझे दिलके आईनेमें मैने बार बार देखा,तेरी अंखडियोमे देखा तो झलकता प्यार देखा..  एरवी तिथे एकमेकांशी बोलले तरी ऐकु येणार नाही इतका कल्लोळ असतो. पण त्या लाल दिव्यामुळे त्या क्षणी सर्व शांत झाले होते. आणि तो अनाम कलाकार आमच्यासाठी गात होता. बाहेर उभे राहुन,खिडकितुन तोंड आत घालुन आम्ही ऐकत होतो.आनंद घेत होतो.
आजुबाजुच्या गाड्यांचे आवाज सुरु झाले. सिग्नल हिरवा झाला.त्यालाहि जावे लागले. पण त्या 5 मिनिटांची त्याने खास आमच्यासाठी पेश केलेलि मैफल कायमची मनावर कोरली गेली. रसिक म्हणुन 2  तासांची आणि हि 5 मिनिटांची उत्स्फुर्त्..दोन्ही मैफली अविट आनंद देऊन गेल्या.
कधि मुंबईत टॅक्सीने फिरायची वेळ आली तर तिचा नंबर पहा.तो जर MH01-B2701 असेल तर त्या कलाकाराशी तुमची भेट होईल.आणि न जाणो ..रफिचं एखादं सुंदर गाणं त्याच्या तोंडुन ऐकण्याचा बहारदार योग तुमच्याही नशिबी असेल.

  

Tuesday, August 2, 2016

कोई जब तुम्हारा ह्रुदय तोड दे

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे

दूर जाणार्‍या पावलांच्या आवाजात हळुच मुकेशच्या धीरगंभीर आवाजात गाणे सुरु होते.ती पाऊल वाटेवर अंधाराकडे जाताना हळुच आवाजाची चाहुल लागुन मागे पहाते...
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तो दुरवरुन कँमेर्‍याच्या दिशेने येत गेट चा एक दरवाजा उघडतो...वळतो कँमेरा त्याच्यावरुन तिच्याकडे ..ती मागे फिरुन दरवाजातुन त्याच्या दिशेला येताना ते दार लाऊन घेते
मेरा दर खुला है खुला हि रहेगा, तुम्हारे लिए,
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे

एका युनिवर्सिटीच्या विस्तिर्ण प्रांगणात त्याला मध्यभागी ठेऊन कँमेरा गोल फ़िरतो..तो लांब जातो हळुहळु..कँमेराही त्याच्यासोबत जातो..

अभी तुम को मेरी जरुरत नहीं,
क्षणभर कँमेरा स्थिर होतो त्याच्या चेहर्‍यावर आणि परत फिरायला लागतो

बहुत चाहने वाले मिल जायेंगे
तिचा क्लोज अप आणि कँमेरा तिच्याडोळ्यांवरुन,केसांवरुन फिरतो..ती मान मागे वळवते..

अभी रूप का एक सागर हो तुम, कँवल जितने चाहोगी खिल जायेंगे
पुन्हा एकदा कँमेर्‍यात दोघेही ...ती कँमेर्‍याच्या दिशेने येते आणि तो मागेच समांतर कँमेर्‍याच्या कक्षेत काही पावले टाकतो व कँमेरा नंतर परत त्याच्यावर..

दर्पण तुम्हें जब डराने लगे, जवानी भी दामन छुड़ाने लगे
परत तिचा क्लोज अप..चेहर्यावर जराशी निर्विकार, किंचित बेदरकारीची छटा, जी खर तर पुर्ण गाण्यात दिसते ती..थोडीशी विरुद्ध बाजुला चालत परत मागे वळुन त्याच्याकडे पहाते.

तब तुम मेरे पास आना प्रिये...

त्याच्यावर लाँन्ग शाँट अणि डावीकडुन उजवी कडे कँमेरा फिरतो आणि तिच्यावर स्थिरावतो.

मेरा सर झुका है झुकाही रहेगा

तुम्हारे लिये..कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे

तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
झाडांच्या फांद्यांच्या सावलीत उभा राहुन तो सांगतोय तिला..

कोई शर्त होती नहीं प्यार में, मगर प्यार शर्तों पे तुमने किया

कँमेरा स्तब्ध..तिच्या चेहेर्यावर चाललेला छायाप्रकाशाचा खेळ..

नजर में सितारे जो चमके ज़रा
पुन्हा त्याच्यावर फोकस..

 बुझाने लगीं आरती का दीया
ती परत फिरते आणि अंधाराच्या दिशेने चालु लागते..अचानक मागे वळुन पहाते आणि तशीच मागे मागे जात अंधारात नाहीशी होते

जब अपनी नजर में ही गिरने लगोअंधेरो में अपने ही घिरने लगो
तो बाहेर हिरवळीवर आणि ती आत..दोन खिड्क्यामध्ये दिसणारे दोघे जण,,मधे काचेच्या तावदानांचे अंतर..दोघे आपापल्या जगात जणु. ती पहात असते त्याच्याकडे आणि पूढच्या क्षणी कँमेरा तिला तिथुन जाताना फक्त दाखवतो..तिच्या मागे जात नाही..

तब तुम मेरे पास आना प्रिये..
ती परत कुठल्याश्या वर्गात शिरते... कँमेर्‍यात फ्रेम मधे फक्त दाटुन राहिलेला फक्त अंधार.आणि कुठेतरी दूर थोडासा उजेड..

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
उंच, कमेर्‍याच्या कोनामुळे उगवल्या सारख्या दिसणार्‍या दोन मिनारांच्या मधुन कँमेर्‍याला ती जाताना दिसते

तड़पता हुआ जब कोई छोड़ दे

उंच लांबवर पसरलेल्या तीन मिनारांच्या सावल्या आणि ती एका कोपर्‍यातुन त्या सावल्यांच्या दिशेनेच त्यांच्यातीलच एक सावली बनून येते..आणि तशीच पुढे चालत रहाते..कालांतराने क्षणभर चार वाटणार्या सावल्यांपैकी तिन कायम स्थिर तिथेच रहातात..तिची एकच सावली पुढे चालत रहाते..तुटुन निघाल्यासारखी.
ती चालत रहाते आणि फक्त धुन ऐकु येत रहाते

मनोगत
हिंदी सिने गीतांशिवाय आयुष्याची कल्पना करणे कठिण आहे. अनेक ग़ीतांनी आपल्याला कळत नकळत भुरळ घातलेली असते. त्यातील काहि आवडत्या गाण्यांवर आपल्याला भावतं ते लिहावं असं मनात आलं.आणि हे गाणं मला आठवलं.
काळ1970 चा...पाश्चिमात्य विचारांचे आकर्षण तेव्हाही होतेच समाजात.तिकडचे कसे सगळे चांगले यावर लोक भरभरुन बोलु लागले होते. अशा परिस्थितीत हा सिनेमा आला.पाश्चिमात्य देशात वाढलेली पण मुळची भारतीय असलेली ती आणि तिच्यावर प्रेम करणारा पण भारतीय मुल्ये जपणारा तो यांच्यातली हि खुप छान गोष्ट आहे.आणि त्यातले हे गाणे खुप सुन्दर जमुन आलेले आहे. आपण खुपदा ऐकले असेलच म्हणा. शब्द,संगित,गायन सगळे उत्कृष्ट. पण हे सगळे आत पर्यंत झिरपायला या गाण्याचा कँमेरा हा एखाद्य पात्राप्रमाणे आपल्याला सर्व काही उलगडुन दाखवतो. शब्दाला योग्य न्याय देणार्या प्रतिकात्मक गोष्टी खरोखरच ती गोष्ट मनात घर करुन बसायला नकळतपणे मदत करतात.
परवा मनोजकुमारला कुणितरी विचारले रेडिओ वर मुलाखतीत...कि तुमच्या गाण्यांचे टेकिंग इतक़े खास कसे असते..तुम्हाला कसे सुचले तेव्हा? त्याचे उत्तर खुप छान होते.तो म्हणाला कि माझ्या सिनेमात ग़ाणी नव्हतीच्..गोष्ट पुढे नेणारा तो एक प्रभावी भागच असतो गोष्टीचाच..नव्हे ती गोष्ट्च असते.
हे गाणे सार्वकालिक आहे. आजच्या पिढीला हि हे गाणे खुप काही देऊ शकते. कारण असं वाटतं कधीकधी कि आपले म्हणुन असलेले काहीतरी हरवत चाललेले आहे.
केवळ मनोज सायरा यांच्यातली हि गोष्ट उरत नाही...तर दोन पिढ्यांमधली,दोन संस्कृतींमधली, दोन जगांमधली..एक पुढारलेले "समजले" जाणारे दुसरे मागासलेले "समजले" जाणारे, दोन वास्तवांमधली..एक ज्याला हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आणि तरीही वाट शोधणार्‍या समाजाची आणि दुसरे कुठ्लाहि इतका प्राचीन् इतिहास, मुल्ये नसलेल्या प्रदेशातील व्यवहारी माणसांची....म्हटलं तर दोघांची वैयक्तिक गोष्ट किवा म्हटलं तर फार मोठ्या कँनव्हासवर चितारलेला मोठा प्रश्न.
छायाप्रकाशाचा खेळ, अंधाराचा खुप सुदंर उपयोग, शब्दामागुन उघडले जाणारे दार, लांबलेल्या सावल्या अणि सावलीची फारकत घेणारी तिची सावली..सर्व काहि त्या गाण्याचा मुड संभाळणारी आणि हे सर्व तटस्थपणे टिपणारा कँमेरा या गाण्याला अधिक उंचीवर घेऊन जातो.
दिग्दर्शक् मनोज कुमारच्या चित्रपटांच्या गाण्यांबद्दल बोलावेच लागेल..बोलेनही..एकेकाची वेळ येईल तेव्हा.
सध्यापुरती एकच विनंती...हे वाचुन झालय ना... आता मनसोक्त त्या गाण्याचा आस्वाद घ्या..यु ट्युबवर जाऊन हे गाणं शोधा आणि पहा,ऐका. पहा पटतय का मी काय म्हणतोय ते.   

Movie/Album: पू रब और पश्चिम (1970)
Music By:
कल्याणजी-आनंदजी
Lyrics By:
इन्दीवर
Performed By:
मुकेश
Cinematographer: वी एन रेड्डी
 

मुकुंद इंगळे