Wednesday, January 31, 2024

(वि) मानस वेध

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

(वि)मानस वेध

ही अध्यात्माची पहिली पायरी आहे...हा माझा हात हवेत असलेल्या विमानाला पकडू पाहतोय.मला ते विमान हवं आहे..जर हा माझ्या बालपणचां फोटो असेल तर माझी उत्कंठा,कुतूहल तुम्ही समजू शकाल.जर हा मोठे झाल्यावरचा असेल तर हा केवळ गंमतीचा,अशक्य गोष्टीचा निर्माण करण्यात आलेला क्षण आहे...असे तुम्ही म्हणाल...आणि एक छानसे स्मितहास्य कराल.

कारण मधल्या काळात मी कदाचित विमान जवळून पाहिले असेल…कदाचित त्यातून प्रवास देखील केला असेल..तीच गोष्ट तुम्हालाही लागू. जेव्हा तुम्ही आणि मी..दोघेही समान ,विमान म्हणजे काय,ते किती मोठे असते इत्यादी जाणून घेतल्यानंतरच्या पातळीवरून त्याकडे पाहू तेव्हा त्यातली अशक्यता लक्षात येईल.

परमेश्वर या विमानासारखा असावा..हाती यावसा वाटत असेल तर २ पर्याय..

पर्याय एक म्हणजे हात इतका मोठा हवा की हा क्षण प्रत्यक्षात येईल..

पर्याय दोन..मनाने एकदा विमानाचे विशाल स्वरूप जाणून घेतले की या चित्रातल्या हातात विमान खरोखरीच पकडता आल्याचा आनंद होईल..

या वेळी तुमच्या चेहऱ्यावरचे स्मित दोन्ही पर्याय यशस्वीरित्या अंगिकारल्यामुळे उमटेल.

असे स्मित माझ्या चेहऱ्यावर उमटत नाही तोपर्यंत मी पहिल्याच पायरीवर रहाणार.

लेखन:मुकुंद इंगळे


Tuesday, January 30, 2024

आर्द्र का(त)ळ

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

आर्द्र का(त)ळ 

हा अवशेष नाही..तर एका चिरंजीव किल्ल्याचा भाग आहे. 

पाहिलं तर एक,त्या काळी चौकोनी आकार दिला गेलेला एक खळगा..कदाचित खाली झरा असावा किंवा पावसाचे वहात येणारे पाणी जवळच्या टाक्यात वहात जाईल तेव्हा हा चौकोन देखील पाण्याने भरून जाईल अशी रचना...रचनाकाराची कमाल. असंख्य पावसाळे नुसते पाहिले नसतील..तर अंगावर झेलले असतील. विजांचे कडकडाट,रात्रंदिवस कोसळणारा पाऊस,कडाक्याची थंडी आणि आग ओकणारे उन या कातळाने सहन केले असेल.आणि या साऱ्या निसर्गाच्या खेळात आपल्यातला ओलावा खळगाभर कायम जपला असेल...अजून जपतोय.जुना झाला, राकट असला तरी शेवाळे बिलगून असते ..आजूबाजूच्या फटीतून इवलेसे गवत उगवते कधी कधी.

प्रत्येकाच्या मनात एक असाच किल्ला बांधला जात असतो.रचनाकार असतो वहात जाणारा काळ..जो वाहता वाहता तो एखादा ओलाव्याने भरून जाणारा खळगा कोरून ठेवतोच.

किल्ला कधी म्हातारा होत नाही...तो चिरंजीव असतो.

लेखन: मुकुंद इंगळे


Monday, January 29, 2024

समर्पण

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

समर्पण

ते ताजतवानं आहे

ते गुणांच्या अनेक तरल पाकळ्यांनी बहरलेले आहे

ते आकर्षक रंगाचे आहे

ते अनेक पदरी पाकळयातून फुललेले आहे

त्याच्या सर्व पाकळ्या केंद्रीभूत जाणिवेच्या केशर 

तुऱ्यांशी संलग्न आहेत

ते बोटांच्या पंच महाभूतांमध्ये स्थिर आणि स्थित आहे

परमेश्वराच्या हाताची अंगीभूत ऊब त्याला लाभली आहे

परमेश्वर ते आपल्याला अर्पण करतो आहे

इतकं सुंदर मन आपण कुणालाही अर्पण करू..

परमेश्वर समजून..

भक्तीच्या,प्रेमाच्या,स्नेहाच्या सुवासाची त्यात भर घालून...

एका सार्थ समर्पणाप्रती...

लेखन:मुकुंद इंगळे 




Saturday, January 27, 2024

सोनवर्खी

चित्र वेध 
(चित्र सौजन्य: उत्तरा गोगटे)
सोनवर्खी 
आयुष्याच्या जीर्ण होत चाललेल्या पानावर तुझ्या आठवणींचे घननिळे फुलपाखरू क्षणभर बसले...आणि आयुष्य सोनवर्खी होऊन गेले...     
जीर्ण होत असलेल्या पानावर अजूनही दव पडतं अधून मधून...एखाद्या व्याकूळ पहाटेस .                                      लेखन: मुकुंद इंगळे                           मुकुंद प्रभात

Friday, January 26, 2024

परिस्थिती

चित्र वेध (चित्र सौजन्य: अनामिक)

परिस्थिती

तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे..

मध्यंतरी परिस्थिती बरीच बिघडली होती..

परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली होती..

पण आता परिस्थिती थोडी सुधारते आहे..

मागे परिस्थिती भीषण दिसत होती..

पण परिस्थिती दिसते तशी रहात नाही...

परिस्थितीचे हे खरे वास्तव चित्र आहे..

परिस्थितीने वेदना दिल्यात,चटके दिलेत..

पण तेवढेच दु:ख भोगले देखील..

म्हणून आज ही परिस्थिती आहे..

पण परिस्थिती बदलू लागली..

अशा परिस्थितीने संयमाने बदलाची,सुधारण्याची वाट पहिली..

डोळे झाकून आत पाहिले नी परिस्थिती बदलू लागली..

परिस्थिती सुधारली की जगणे सुसह्य होईल..

आता मात्र काळानुरूप बदलत्या, सुधारणाऱ्या परिस्थितीचा 

खरा मोहक चेहरा, एक अम्लान स्मित घेऊन,

हळू हळू जगासमोर येत आहे..

तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे..

परिस्थितीची..

लेखन: मुकुंद इंगळे




Monday, January 22, 2024

ओलावा

चित्र वेध (चित्र सौजन्य:मीना गोगटे)

ओलावा

खूप सुंदर चित्र आहे हे. काही पाण्याचे थेंब, दवबिंदू नसावेत..आणि एक फुलपाखरू त्या थेंबास कदाचित प्राशन करण्याच्या विचारात आहे.अर्थात त्याच्या मानाने तो थेंब मोठा आहे…वरती एक आकाराने मोठा थेंब दिसतोय.कदाचित या आधी फुलपाखरू तिथे बसले असेल आणि त्याच्या फडफडण्यामुळे,

पंख लागून दोन छोटे थेंब एकमेकात मिसळून गेले..सहजपणाने..अस्तित्व न लोपता थेंबाने आपले आकारमान वाढवले.आपल्याला हवं तेवढं पाणी पिऊन झाल्यावर कदाचित या सर्व थेंबांचे देखील तसेच होईल का? जर तसे झाले तर मोठ्या भागावर पाणी झिरपेल आणि ओलावा टिकेल, रुजेल निदान काही काळ तरी.पाणी न मुरण्या इतका पृष्ठभाग कठीण असेल तरी तो भाग,पाण्याची वाफ होऊन ते नाहीसे होईपर्यंत तरी ओला राहील.

आजच्या धावपळीच्या कोरड्या जगात, भावनेच्या थेंबातला ओलावा असाच पसरायला हवा.मने जोडली जातील आणि जोडलेलीच राहतील.

बघुया या विचारांचे फुलपाखरू आपल्या मनावर कधी बसतंय ते.ले

लेखन: मुकुंद इंगळे

Sunday, January 21, 2024

अंतर्यामी


चित्र वेध

अंतर्यामी अंतर्रामी 

हा विशाल अखंड भारत आहे..जिथे अयोध्या आहे. अयोध्या...म्हणजे जिथे युद्ध होऊ शकत नाही अशी जागा..जिथे नेहमी रामराज्यच वसते.अयोध्या हे नाव इतके विचार प्रवर्तक आहे...तशीच एक अयोध्या माझ्या मनात आहे.जिथे मला कुणासोबत संघर्ष दिसत नाही.सर्व काही छान.. कारण इतक्या पराकोटीचे मतभेदच नाहीत.

पण तरी या माझ्या सात्विक अयोध्येवर पिसाटलेल्या विचारांचे रोज आक्रमण होते.माझी अस्मितारुपी सीता रोज पळवली जाते.

तिला सोडवण्यासाठी रोज मी राम होतो.रोज वनवास भोगतो...

हे माझ्या मनातील श्रीलंका बेट आहे.चहूबाजूंनी पाणी...एकीकडे असत्याचा  महासागर,दुसरीकडे सत्याचा उपसागर...

मी रावण इथला राजा. उच्चविद्याविभूषित..सतत रूपे बदलू शकणार मायावी..हुशार...पण मोहाच्या मोहात पडलेला.त्यामुळे सतत संघर्ष.अशाच मोहापायी मी एका सितेला,लालसेला पळवून आणले आणि शोकवनात ठेवले.तो येण्यापूर्वी ते अशोकवन होते.

मी राम..इच्छाशक्तीचा हनुमान आणि सात्विक विचारांची वानरसेना सोबत घेऊन मी निघालो.पुरुषार्थाचे न बुडणारे दगड वापरून साहसाचा सेतू बांधला आणि लंकेवर आक्रमण केले आणि सीतेला सोडवून आणले. रावणासाठी जी लालसा होती..ती माझ्यासाठी माझी अस्मिता होती.

भारतावर अनेक आक्रमणे झाली...ती करणाऱ्यांकडे ' अविचार ' होता...म्हणून त्यांनी विचारांची मंदिरे फोडली.

भारताने एक आक्रमण केले ते अविचाराचे उच्चाटन करण्यासाठी.

५०००वर्षांपूर्वी राम करू शकला ते ५००वर्षांपूर्वी झाले नाही...मंदिराची तोडफोड करून अस्मितेची सीता आक्रमण करणाऱ्यांनी पळवून नेली होती तरीदेखील...

कारण माझ्यात 'राम ' राहिला नव्हता. 

पण आज अस्मितेची पुनर्स्थापना होते आहे...प्रत्यक्ष,खऱ्या अयोध्येत,देखण्या मंदिरात आणि माझ्या अंतरातील,भक्तीने तेवत असलेल्या जाणिवांच्या पणत्यांनी सजवलेल्या मनाच्या गाभाऱ्यात राम लल्ला शोभून

दिसतो आहे.

लेखन:मुकुंद इंगळे 


Friday, January 19, 2024

जरा सी आहट होती है..

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
जरा सी आहट होती है...
हे गुलाबाचं फुल कुणीतरी ठेवलंय..कुणासाठी तरी.तुम्ही समोर आलाच आहात तर विचार करा...हे तुमच्यासाठीच असेल का?
नेमके असे प्रेमबंधात, स्नेहबंधात, मर्मबंधात असणारे किती जण आहेत...जे तुमच्यासाठी असा गुलाब ठेऊन जातील.
विचारात पडलात?
या विचारात कुणाकुणाची आहट...म्हणजे चाहूल जाणवते आहे .
उलटा विचार करु..तुम्ही जर असे फुल ठेवले असते तर ते कुणासाठी, कुणाकुणासाठी ठेवले असते.विशेषत: घेणाऱ्याला ..ते तुम्ही ठेवलंय हे वेगळं सांगायची गरज पडणार नाही इतक्या खात्रीचे.
फक्त विचार करा..उत्तर ज्याचे त्याला ठाऊक.
खरं तर हे फुल म्हणजे आपलं मन आहे.आणि ते परिस्थितीच्या चौकोनी..चार दिशांच्या खांबावर आपणच ठेवले आहे..रोज ठेवतो आपण ते...आणि आपलं मनच चाहूल घेतंय... की कारण कुठलेही असो...आज आपल्या अंतरात कोण पोहोचणार ? जो हा गुलाब उचलेल तो की ज्याला आपण हे फुल देऊ तो.?
जगात अनोळखी कुणीच नसतं आणि ओळखीचं पण कुणीच नसतं.म्हणून हे फुल ठेवलंय.जो घेईल तो ओळखीचा...नुसता समोरून जाईल तो अनोळखी.
थांबा...कुणीतरी येतंय..
बघुया
कही ये वो तो नहीं !
लेखन:मुकुंद इंगळे

Wednesday, January 17, 2024

स्वप्न फुल

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
स्वप्न फुल
आपली स्वप्ने "तो" फुलपाखरांच्या पंखावर ठेवतो…
तरी त्यांना समजत नाही,इतकी ती तरल असतात.
आपण फुले पाहताना त्या फुलाभोवती भिरभिरणारी 
फुलपाखरे त्यातील एक स्वप्न आपल्या नजरेतून, 
मनामध्ये अलगद रुजवते.आणि ते फुलू लागते.

पूर्ततेच्या या फुलाला पहायला फुलपाखरे परत जवळ 
येतात. तेव्हा लक्षात येते की..  
स्वप्नफुल उमललंय खरं...पण त्याभोवती भिरभिरणारी 
फुलपाखरे नजरेला पुन्हा नवे स्वप्न देऊन गेलीत.
लेखन:मुकुंद इंगळे

http://manmukta.blogspot.com/

Tuesday, January 16, 2024

मुशाफिरी

मुशाफिरी

निळ्याशार जीवनाचा प्रवास चालू असावा आकाशाखाली 

मनाच्या तितक्याच अथांग निळ्या जळात देहाची 

नाव घेऊन घालावी काळाच्या वाहत्या प्रवाहात ..

कधी शांत तर कधी रौद्र प्रवाहात.. 

कधी दूःखाची वादळे अनुभवावीत तर कधी मधूनच 

सुखाची बेटे दिसावीत. 

रोज नवे आशा आकाक्षाचे सूर्योदय अन सूर्यास्तही पाहावेत.. 

पाहावेत रोज नव नवे आकाशात उडणाऱ्या पक्षांचे थवे.. 

भावनांचे आणि सागरतळी वावरणारे, अधूनमधून दिसणारे 

स्वप्नांचे मासे..

व्हावे नतमस्तक पंचमहाभूतांपुढे.. टळटळीत उन्हात तर कधी 

विखुरलेल्या चांदण्यात... 

रोज नवे किनारे जोडावे... सोडावे... श्वासांचा सुकाणू 'त्याच्या' 

हाती असलं तरी बंदरावर सोडायचे दोर आपल्या हाती ठेऊन.... 

ते जिथे सोडायचे तिथे नाते जोडायचे.. 

पुढे निघायचे मनातल्या नव्या  किनाऱ्याच्या शोधात येणाऱ्या 

प्रत्येक क्षणाला वाहू द्यावे… जाणाऱ्या प्रत्येक श्वासात... अनंतकाळ. 

रचनाः मुकुंद इंगळे

Monday, January 15, 2024

क्लाउड शेअरिंग

चित्र वेध (चित्र सौजन्य: अनामिक)

क्लाउड शेअरिंग

आभाळाचे मन कधी कधी दाटून येत असेल का?आनंदाने अथवा दुःखाने? ते  आपल्या भावना कुणाशी, कसे शेअर करत असेल..की ढगांनी भरून आलेले आभाळ त्यांना सांगत असेल आपली कहाणी आणि मग ढगांचे अश्रू पाऊस म्हणून पडत असतील.

कधी आभाळ आनंदाने वाऱ्याशी हितगुज करत असेल..आणि ते ऐकून वारा हसत हसत सैरावैरा धावत असेल…आपण म्हणत असू की वादळ आलंय.

की कधी नुसतंच आभाळ आणि वारा जुनी गाणी ऐकण्यात रमलेले असतील आणि वारा त्या लयीत डोलत असेल..आपण म्हणत असू की आज किती सुंदर गारवा आहे हवेत.हलकासा वारा मस्त वाहतोय .

कधी कधी आभाळ मेघांना बोरकरांची,पाडगावकरांची कविता ऐकवत असेल...मेघांच्या अंगावर रोमांच उभे रहात असतील..आपण म्हणत असू की फुलांवर,पानांवर पडलेलं दव किती सुंदर दिसतेय.

कधी भरून आलेल्या आल्हाददायक वातावरणात आभाळाला क्षितिजाची खूप तीव्रतेने आठवण येत असेल..तेव्हा आठवणींचे इंद्रधनूष्य त्याच्या शुभ्र अंगावर सप्तरंगात उमटत असेल...

कधी कधी आभाळ निरभ्र होऊन त्याचे आकाश झालेले असताना…क्षितिजाला कवेत घेऊन चांदण्यात निवांत बसलेले दिसेल.

लेखन : मुकुंद इंगळे 

Sunday, January 14, 2024

संक्रमण

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
संक्रमण
असीम आकाशात संक्रांतीला असंख्य पतंग जन्माला येतात, दिसू लागतात.उडवणारे आपापल्या परीने बदवत असतात आणि काही पतंग भरपूर उंची गाठतात..
तर काही थोडे खालून उडतात.काही दुसऱ्या उडणाऱ्या पतंगांपेक्षा वरचढ असतात ते मांजाने इतर पतंगाना कापून टाकतात आणि जमिनीवर असणाऱ्या त्याच्या मालकाची त्याला गोते खात बघताना आणि त्या हेलकावे घेणाऱ्या पतंगाला पकडताना दमछाक होते.
कुणाचा मांजा धारदार तर कुणाचा मांजा गुंतल्यावर त्यावर येणारा ताण जास्त. निमित्त काही असो...त्या पतंगाची दिशा आणि दशा बदलते आणि तो जमिनीकडे येऊ लागतो. असं झालं की..नशिबाने आपली फिरकी घेतली असे समजून परत 
नवा पतंग घ्यावा..नवा मांजा घ्यावा..आणि फिरकी नियतीकडे सोपवावी.
कारण पतंग म्हणजे आपली स्वप्ने आणि मांजा म्हणजे त्यांना 
साकार.. "मान जा" म्हणण्यासाठी घेतलेली मेहनत.
कदाचित नवा पतंग आपले आकाश गाठू शकेल...नाही..तर परत एक नवा घ्यायचा.
आपले पाय वास्तवाच्या जमिनीवर ठेऊन आकाशात 
एकामागोमाग स्वप्नांचे पतंग उडवत ठेवायचे..
यालाच संक्रमण म्हणत असावेत बहुधा..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 
लेखन : मुकुंद इंगळे

Saturday, January 13, 2024

चंद्रसंस्कार

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

चंद्रसंस्कार 

वाहत्या पाण्यावरील चंद्राचे प्रतिबिंब किती सुंदर दिसते आहे...जणू प्रतिबिंबातून त्याची किरणे द्रवरूप होऊन वहात आहेत.त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा रंग सुद्धा मोतिया झाला आहे.रात्रीचा हा खरोखरच अदभुत नजारा आहे.

चंद्र मनाचा कारक आहे.त्याचे प्रतिबिंब जीवन प्रवाहात क्षणोक्षणी उमटत असते.सूर्याचां प्रखर प्रकाश तो परावर्तित करताना त्याला शीतल, आल्हाददायक करतो..त्यांना मोत्याचा रंग देतो.आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण देखील ..त्याला आपला विशिष्ट रंग,आपली समज,आपली बाजू.... देऊन जीवनप्रवाहात परावर्तित करत असतो...करत राहतो.आणि आपल्या सहवासात आलेला प्रत्येकजण त्यात भिजून जातो..किंवा आपल्यासाठी नवा चंद्र होतो.

मनात वाहणाऱ्या विचारांचा हा मोतिया क्षण मनातच गोठला गेलाय.

लेखन:मुकुंद इंगळे

Friday, January 12, 2024

मेघ छाया

चित्र वेध 

(चित्र सौजन्य:श्री प्रकाश पिटकर)

मेघ छाया

कधी कधी मनावर विचारांच्या ढगांची 

विशाल आकाराची सावली पडते.

सावलीमुळे काही काळ मन झाकोळून जाते…

तात्पुरती असली तरीही सावलीत ते काही काळ रमते.. विसावते..!

वाहणारे बदलाचे वारे सावलीला पुढे पुढे ढकलतात आणि पुन्हा परिस्थितीच्या उन्हात एखाद्या डोंगराप्रमाणे ते स्थिर अविचल उभे राहते... 

ऊन,पाऊस, वादळ वारे झेलत. आपल्या 

साऱ्या संभाव्य क्षमता वापरून, त्यांचा सामना करत.

पण ढगाच्या सावलीतला तो एक क्षण,मनाला प्रचंड उभारी देऊन जातो.

लेखन:मुकुंद इंगळे

Thursday, January 11, 2024

शबरी माला

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

शबरी माला

तिच्या परडीत मोगऱ्याची लांबलचक माला आहे, 

तिच्या मुंडू साडीच्या श्वेत रंगासारखीआणि तुळस सुद्धा 

आहे.ती दर्शनाला निघाली आहे. देवळात शिरण्याआधी 

ती पुष्करणी च्या पायरीवर थांबली.तिच्या मनात काय 

आले कुणास ठाऊक.ती तिथेच बसली. परडीतल्या 

मोगऱ्याचा मोहक घमघमाट सुटला होता.पण तरीही 

तिने मनभर,दीर्घ श्वास घेऊन त्या मोगऱ्याचा सुगंध 

मनसोक्त अनुभवला...

देवाला जी गोष्ट वहायची असते ती परिपूर्ण असावी…

या साठी कदाचित तिने तसे केले असावे.

ती आजच्या युगातील शबरी आहे...जिने मोगऱ्याची माला 

अर्पण करण्याआधी त्याच्या सुगंधाची खात्री करून घेतली. 

आता ती देवळात जाईल आणि ती माला निश्चिंत मनाने 

“त्याला” अर्पण करेल...आणि तुळशीपत्र देखील ठेवेल 

आपल्यातील अहंकारावर ..

अर्पण ते समर्पण हा तिचा प्रवास पूर्ण होईल आणि 

मोगऱ्याच्या सुवासाने गाभारा भरून जाईल.

लेखन:मुकुंद इंगळे


Wednesday, January 10, 2024

जिंदगी इक सफर है सुहाना..

चित्र वेध

जिंदगी इक सफर है सुहाना...!

एका कारमधे बसून प्रवास सुरू आहे.कार  आपणच चालवत आहोत.डावीकडे,उजवीकडे दाराच्या बाहेरच्या बाजूला आरसे आहेत आणि एक आरसा आतमधे मधोमध बसवलेला आहे..ज्यात मागे असणारी वाहने दिसतात. खिडकीबाहेरच्या डावीकडील आरशात कोण  ओव्हरटेक करून पुढे जाणारे वाहन दिसते..तसेच ते उजवीकडच्या आरशात देखील दिसते.मागे वहान नसेल तेव्हा आरशात रिकामा रस्ता,मागे जाणारी माणसे,झाडे इत्यादी दिसत राहते.

या सर्वात आपण कोणत्या लेन मधे आहोत ते महत्वाचे..तारुण्याची लेन पहिली.सुसाट वेगाने जाणाऱ्यांसाठी...दुसरी मध्यमवयीन..कार्यरत पण वेग जरा कमी.तिसरी आरामात,कोणतीही घाई नाही अशा वरिष्ठांची..

पहिल्या लेन मधे आहेत त्यांना उजवीकडील आरशात इतर वाहन दिसत नाही...फक्त डाव्या आरशात ओव्हरटेक करून पुढे जाणारी वाहने...त्यांचे दोनच पर्याय..त्यां वाहनांना पुढे जाऊ देणे किंवा आपला वेग वाढवणे.

दुसऱ्या लेनमधील वाहनाच्या चालकाला दोन्ही आरशांवर  लक्ष ठेवून असावे लागते.

म्हणून त्यांना वेग पहिल्या लेन मधील वाहनांपेक्षा थोडा कमी असतो.

तिसऱ्या लेन मधील चालकाला डावीकडे कुठलेच वाहन दिसत नाही...ओव्हरटेकचा प्रश्नच नाही.उजवीकडून जाणारी वाहने धीम्या गतीने जात असतात...पहिली लेन दूर राहिलेली असते.

प्रवास सुरू असताना निवांतपणे गाणी ऐकता येतात,गप्पा मारता येतात.डावीकडे असल्याने कधीही वाहन थांबवता येते...बाहेर पडून कितीही वेळ निसर्गाचा,एखाद्या दृश्याचा,वातावरणाचा,निवांततेचा अनुभव घेता येतो.

उजव्या आरशातून गतकालाची आपलीच प्रारुपे चालक पाहू शकतो ..ते पाहून ठरवू शकतो की ही जीवनाची सफर कशी आहे?

Suffer की सफर की सुहाना सफर.

उजवीकडचा आरसा भूतकाळ दाखवतो..मधला वर्तमानातील नुकत्याच होऊन गेलेल्या गोष्टी प्रतिबिंबित करतो.डावीकडचा आरसा बघायच्या,करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करून पाहण्याची प्रेरणा देत राहतो.

आपण गाडी या साऱ्याचा आनंद आस्वाद घेत मस्त मुडमधे चालवत राहतो.

लेखन:मुकुंद इंगळे


Saturday, January 6, 2024

मेरी आवाज ही पहचान है

मेरी आवाज ही पहचान है 

घरी मॅच पहात बसलो होतो.टीव्ही चा आवाज घरातला होताच आणि बाहेरून देखील काही आवाज येत होते. अचानक कुठला तरी आवाज बंद झाल्याचे जाणवले. एसी बंद झाला होता कुणाचा तरी.

तो आवाज बंद झाल्यावरच कळला.असाच अनुभव बस प्रवासात,विमानतळ इत्यादी ठिकाणी पण येतो.गंमत हीच की, तो बंद झाल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही.

चहूबाजूंनी येत असलेले... बाहेरचे आतले...सगळेच आवाज आपण कानांनी ऐकत नसतो. मात्र सगळे आवाज कानावर पडत असले तरी आपण मात्र निवडकपणे "आतून" ऐकत असतो. आपण अंतरावरून येणारे आणि अंतरातून येणारे...आवाज,

त्याकडे दुर्लक्ष केलं, तरी ते सुरूच रहातात.. फक्त त्यांचं जाणवणे थांबते.

काही आवाजांचे थांबणे मात्र जगणे आमूलाग्र बदलून टाकते,मुश्किल करते. आईवडिलांचे जाणे,आवडत्या व्यक्तीचे जाणे किंवा आयुष्यात न येताच आयुष्यातून दूर होणे...गुरुजनांचे शिकवणे...यासोबत स्वतः चा आवाजच विनाकारण एखाद्याला नकळत दुखावून जातो..सहेतुक अथवा अहेतुक...

हे आणि असे सगळे आवाज आतून ऐकावे लागतात. यांचे अवेळी,अचानक थांबणे स्विकारणे जड जाते.

काही आवाज उत्साह देतात...जरी ते फार लक्षपूर्वक ऐकत नसतो आपण.वाहणारा झरा,ओढा, वारा...गाण्यांचे अथवा सिनेमातील सीन्ससाठी दिलेले पार्श्वसंगीत..जंगलात फिरताना ऐकू येणारे आवाज. चंद्रप्रकाशात समुद्रकाठी रात्री फिरताना जाणवणारी हलकी गाज...किंवा एखादा गहाण वाटणारी आयुष्यातील समस्या मनाला सतावत असताना चौपाटीवर जाऊन नुसतं काही वेळ बसल्यावर..त्या समस्येची अनेक उत्तरे सुचतात, तेव्हाचा भरतीचा आवाज...

अशा वेळी आवाज थांबून चालत नाही.

आशा,लता,रफी,मुकेश, सुमन,महेंद्र कपूर, मन्ना डे,हेमंत कुमार,किशोर अशा सर्व  दिग्गज गायकांचे आवाज ऐकू येणे ,जाणवणे थांबले तर खुशाल समजा की तुमचे श्वास थांबले असतील म्हणून.

ऐकू येणाऱ्या आवाजांपेक्षा असे अचानक थांबल्यावर जाणवणारे आवाज जास्त व्याकूळ करतात आपल्याला.

लेखन:मुकुंद इंगळे


Friday, January 5, 2024

"परी "स्थिती

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

"परी "स्थिती

आपल्या आठवणींच्या एकेक पायऱ्या उतरत इतक्या घाईघाईने मी कुठे निघाले आहे..माझे मलाच ठाऊक नाही. पायऱ्या उतरत उतरत माझ्या रंगीत फ्रॉकने व्यापलेल्या, पसरलेल्या मखमली कपड्याने प्रत्येक पायरीला, काही क्षण तरी झाकोळले आहे...ज्यावर आपणही एके काळी रेंगाळत असू.जसजशी मी दूर चालले आहे तसा माझ्या फ्रॉकचा रंगदेखील अलिप्त निळसर होऊ लागलाय आता. मगाशी नकळत मागे वळून वर पाहिले...राजवाडा आता अंधुकसा उरलाय नजरे मध्ये....गंमत म्हणजे तिथे अजूनही प्रकाश आहे पसरलेला.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक 'समय परी' मनात सतत सोबत असते.बाल्य,तारुण्य,वृद्धत्व या तीन पायऱ्यांच्या टप्प्यांना विलग करणाऱ्या काळाच्या सपाट सोप्यावर, त्या परी सोबत घालवलेल्या क्षणांच्या,आठवणींचे सोपान हळूहळू तयार होत जातात.पण जगण्याच्या धामधुमीत मनातल्या त्या परीचा हात  परिस्थितीमुळे कधी निसटतो,सुटतो कळतच नाही..त्या बेसावध क्षणी जगण्याचा भास संपतो.स्वप्नांचा राजवाडा धूसर होत जातो आणि त्या परीचा

एका पायरीवर, उतरताना पायातून तिने मुद्दाम काढलेला की निघालेला,राहिलेला ...सल आणि समाधान यापैकी एक समाधानाचा बुट.. या साऱ्याची साक्ष म्हणून आपली टोकदार टाच उंच करून तिथूनच आपल्याकडे पहात रहातो.

लेखन:मुकुंद इंगळे


Tuesday, January 2, 2024

निळावले मन

चित्र वेध (चित्र सौजन्य: मीना गोगटे)
निळावले मन
सोबत स्वतःचे प्रसन्न निळेशार आकाश आपल्या पंखांवर घेऊन उडणारे फुलपाखरू ही मनाची वृत्ती आहे.
पाकळ्या,केशर नसलेल्या फुलात मकरंद मिळणार नाही हे त्याला ठाऊक नसेल का?
पण तरीही त्यावर बसलंय. दुसऱ्या फुललेल्या फुलातून टिपलेला मधाचा सूक्ष्म थेंब या सुकलेल्या फुलात ओतायला..या आशेवर...नव्हे खात्री असावी त्याला की हे पण एक दिवस परत फुलेल.
या मधासाठी तरी अजून एखादे फुलपाखरू इथे येईल.येताना आपले परागकण लगडलेले नाजुक पाय घेऊन यावर बसेल.या निळ्या फुलपाखराने ठेवलेला थेंब ते प्राशन करेल...
आणि काही दिवसांत हे फुल पुन्हा उमलेल.
"आज फिर जिनेकी तमन्ना है" इतकचं ऐकू येईल...नंतर येणाऱ्या फुलपाखरांना.
मरनेका इरादा चा प्रश्नच नाही 
ज्या क्षणी या फुलपाखराने आपल्याकडचा मकरंद त्या फुलाला दिला...त्या क्षणी त्याच्या पंखात ते गहिरे,क्षितिजसीमा नसलेले अनंत आकाश समरसून गेले.
ती एक वृत्ती आहे.
लेखन:मुकुंद इंगळे