Friday, August 30, 2024

एक शाम रसिली...रफिली..!

एक शाम रसिली...रफिली..!

वो एक हसीन शाम थी..मुझसा दिवाना जिसके ऊपर लाख निगाहें ठहरी थी..तेरे मेरे सपने मुझे कवी बना रहे थे...जब रुख से नकाब तूमने हटाया और मैने चौदाहवी का चांद दिल के झरोखेसे देखा.. तुम्हारे रंग और नुर की बारात जिंदगी का साथ निभाते निभाते... मन में चली आयी. ऐसा मौका फिर से मिले इसलीये तो मैने प्रेम पत्र लिखकर मेरे मन में नाचने वाले मोर से परदा हटाया था...
तबसे तुम्हे पुकारता चला आया...तेरी प्यारी सुरत को मेरे लिखे खत मे  ढालते समय सर चकरा ना जाता तो ही तू इस तरहसे दर्द ए दिल से क्या हुवा तेरे वादोंको ये बार बार देखके..मेरे प्यार के सितारे बदन से लपेटकर.. आखिर तुम जो मिल गये ...तब मस्त बहारोंका आशिक बनके, तुम्हारा चांदसा रोशन चेहरा देखके ..अपने आपको कर चले हम फिदा..सिर्फ तुमपे...
इतनी हसीन वो एक शाम थी 
लेखन:मुकुंद इंगळे

Wednesday, August 28, 2024

समर्पण

चित्र वेध ( चित्र सौजन्य:अनामिक)

पूजा करताना एका विशिष्ट क्षणी मी देवाला फुल वाहिलं आणि डोळे मिटून त्याच्याकडे (की आत) पाहिलं.

मला आठवलं..ते फुल ताजे मिळवण्यासाठी सकाळी उठून गेलो होतो बाजारात..विविध फुलांतून हेच नेमके नजरेत भरले आणि आता वाहिले.

या संपूर्ण कृतीत माझं असं काहीच नाही. फुलं "त्याची ", फुलवाला "तो" स्वतः...ते आणणारा "त्याचीच" निर्मिती....तरी देखील एक गोष्ट उरते मनात त्या क्षणी.त्याने दिलेल्या मनातला समर्पण भाव.

उद्या हे फुल कोमेजून जाईल. उद्या कशाला..परवा मथुरेतली कृष्ण जन्माची चित्रे टीव्ही वर पहात होतो. सुंदर गर्द जांभळ्या रंगाची कमळे वाहिली जात होती....आणि दहाव्या मिनिटाला ती कुणीतरी तिथून उचलली आणि नव्या फुलांसाठी जागा केली.

कारण वाहिल्या क्षणी ती निर्माल्य झाली होती.एक समर्पणाचा क्षण त्या प्रत्येक वाहणाऱ्याला मिळून गेला होता...कायमचा.

या पार्श्वभूमीवर हा कृष्ण वेगळा भासतो...नेहमी देवाचे डोळे उघडे असतात आणि भक्ताचे मिटलेले ..

यात कृष्णाचे डोळे  मिटलेले आहेत...सुंदर फुल जवळ ठेऊन तो कुणाला वाहणार आहे ते ?एखाद्या राधेच्या की मीरेच्या सुंदर निरभ्र मनाला? तोच जाणे. 


समर्पित केलेल्या फुलाने दिलेला प्रत्येक क्षण आपल्याला अलिप्त करत असतो...बाह्य..भौतिक जगापासून.त्यामुळे तो क्षणही लक्षात नसतो ठेवायचा...फक्त दुरून तटस्थपणे तो क्षण कालौघात विरताना फक्त अनुभवायचा असतो.

म्हणून "मी" आणलेलं.."मी"  वाहिलेलं फुल "त्याला"अर्पण होतं तेव्हा "मी" उरत नाही मात्र "तो" त्या क्षणी "आत" येतो आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी डोळे आपोआप मिटले जातात.




Saturday, August 24, 2024

प्राजक्त सडा

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
आपण देखील प्राजक्त असू...
अनामिक अलौकिक 
झाडावरून काळासवे ओघळणारा...
घरंगळताना आपणही करत असू  सुगंधाची लयलूट...
वाऱ्याच्या झुळूकीसवे..
कालचक्र ओलांडताना ..

मातीचा अलगद स्पर्श होईपर्यंतचेच जगणे असणारा...

मातीवर अनेक फुले पडतात त्याला सडा म्हणतात...
पण
प्रत्येक फुल पडताना एकएकटेच पडते... एकटे पडते..
काय गंमत आहे...
एकट्यालाही सडा च म्हणतात.
एक प्राजक्त सडा
एक विरक्त सडा
लेखन:मुकुंद इंगळे

Monday, August 19, 2024

तुम जो मिल गये हो...एक प्रवाह

तुम जो मिल गये हो

कातळाच्या आत जिथे प्रकाशाचे किरण सुद्धा पोहोचत नाहीत अशा ठिकाणी न दिसणाऱ्या झऱ्यातून थेंब थेंब सुर टपटपत असतात ...ते वाहू लागतात त्या क्षणी एका नदीचा जन्म होतो.ते ठिकाण दिसत नसते..ती जागा नेमकी आहे सुरस्वी मदन मोहन यांच्या अथांग,अनंत सुरावटीनी व्यापलेल्या मनात कुठेतरी. या थेंबांनी हलकेच वाजणारी सुरावट...सुरू होते सुंदर आवर्तनाच्या प्रवाहाने..ती या गान प्रवाहाला वाहतं करते.आणि प्रवाहाचे ओढा नंतर नदी असे प्रवाहित प्रत्यंतर झाल्याचे फक्त आपल्या जाणिवेला समजते...

आणि आपली समाधी भंग न करता त्यात रफीचा मधाळ आवाज ऐकू येतो...

तुम जो मिल गये हो..

पुन्हा चार थेंबाची सुरावट..

तो ये लगता है...

के  जहाँ मिल गया...ऐकताना एक परिपूर्ण..प्रसन्न आपल्याच नादात,लयीत वाहणारी नदी, पार्श्वसंगीतातून आपल्या मनात वाहू लागते.

एक भटके हुवे राही को, कारवाँ मिल गया...

वाहताना वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या दगड पाषणांना रफीच्या आवाजातील चढ उतारांनी अभिषिक्त करत पुढे जात असतो..आणि एक pause... तो खास आधीचे प्रवाह रूप क्षणभर आठवण्यासाठी घेतलेला..आणि सोबत सुरू होते मेघगर्जना आणि प्रचंड सुंदर पाऊस...जो शेवट पर्यंत आपल्याही मनाला चिंब भिजवत रहातो.

पुन्हा वाहणे सुरू होते

तुम जो....

पुढे 

बैठो ना दूर हमसे..मधील पहिले गायलेले "दूर" आणि नंतर गातानाचे "दूर" आपल्याला रफीच्या आणखी "जवळ" नेते आणि त्या प्रवाहात सोबत घेऊन जाते आपल्या अस्तित्वासहित.

एका थेंबाने सुरू केलेल्या प्रवाहाला, कारवाँला आता "आसमाँ" मिळत असतो.

रफीचे हमिंग प्रवाहाची दिशा बदलल्याचे सूचित करते.वेग आणि आवेग वाढू लागतात आणि लय वाढते. आपली घालमेल वाढते वाढते..आणि एकदम सारं काही शांत होतं.

समुद्राच्या लाटा ढगांच्या गडगडाटात किनाऱ्यावर आदळत असताना दिसतात ..अन् फक्त दोन ओळींसाठी लता नावाची लाट आपल्यावर आदळते आणि अनावर सुखात पुन्हा भिजवून जाते.

पण पुन्हा प्रवाह मूळ लयीत येतो.

तुम क्या जानो तुम क्या हो... असं विचारणाऱ्या जलौघाला स्वागतार्ह सोबत मिळालेली असते.

पुन्हा रफीचे हमिंग... आणि वाहण्याची दिशा बदलते..लय वाढते.जणू डोंगरउतारा वरून पाणी बेधुंद सुसाट वाहते आहे.

नव्या आयुष्याची दिशा सापडल्यावर " कारवाँ मिल गया" तल्या गया वर अप्रतिम सुंदर लकेर घेऊन रफी आपल्याला तुडूंब आनंदात भिजवून गात रहातो.

पाऊस कोसळतच रहातो.

गाणं संपतच नाही...रफी लता कानात ऐकू येतच रहातात...आपल्या श्वासात भिनुन...स्पंदनात एकच लय शब्दरूप होऊन ऐकू येते...

तुम जो मिल गये हो

तो ये लगता हैं

के जहाँ मिल गया

लेखन: मुकुंद इंगळे 




Thursday, August 15, 2024

कंदील..काजळी...का जळी?

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

कंदील..काजळी...का जळी?

एक कंदील जळतो आहे.

देहाच्या सुबक चौकटीत दोन बाजूंनी...कर्म आणि श्रद्धा यांनी बद्ध केला गेलेला..

त्या दोन्ही बाजूंच्या वर सुख आणि दुःख याची दोन छिद्रे आहेत...त्यातून सहज निघू नये अशी अडकवलेली दैव नावाची गोलाकार कडी.... बहुधा वर कुठेतरी, विधात्याने प्राक्तनाच्या खिळ्याला लावून ठेवली असावी...सहज दिसत नाही..पण अंदाज लावू शकतो.

दोन बाजू खाली येतात तिथे अनाहत ज्ञान ऊर्जेचा स्रोत देणारे इंधन साठवण्याची छोटीशी टाकीवजा जागा आहे.इंधन पुरवठा नियमित रहावा यासाठी आत्मविश्वासाचा गोल (Goal) आकाराचा नियंत्रक आहे.

त्याच्या वरील बाजूस...जिद्दीची वात ओवून ठेवलेला प्रयत्नांचा बर्नर आहे. वात आणि बर्नर यांचे योग्य संयोजन जिद्दीचा जळताना अपव्यय टाळते.

एक काचेसारखा पारदर्शी,नितळ,नाजूक पण आजूबाजूच्या तप्त वातावरणात पण टिकून रहाणारा..मनाचा गोल.. इंधन टाकी आणि वरील कडी जोडणारा एक दुवा आहे.संस्कारांच्या नेटक्या दिसणाऱ्या तारांनी मनाला स्थित केले आहे.,स्थिर केले आहे.

वात जळताना आपले वर्तन,विषय विकार, विसंवाद,अविश्वास,गैरसमजामुळे काचेवर काजळी धरते..आणि कंदीलातील  प्रकाश यामुळे झाकोळला जातो.

तेव्हा त्या मनाला बाहेर काढून पुन्हा स्वच्छ..पुन्हा पुन्हा स्वच्छ करावे लागते.

एक सुंदर स्वच्छ नितळ काचेतून वात जळताना तेवणारा प्रकाश पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर पडतो.त्यालाही ऊर्जा देतो.

मात्र या साऱ्यात एक भाग महत्वाचे कार्य करतो.

वरच्या दोन बाजू आणि मनाच्या काचेच्या वरील भागात असलेले एक वायुविजन संकुल..ज्याला सगळ्या दिशांनी आरपार लहान लहान आनंद,छंद,भटकंती,संगीत असे झरोके असतात. त्यातून आतली तापलेली, ताण असलेली हवा बाहेर जाते आणि बाहेरील नवी ताजी हवा आत येते...कंदिलाच्या एकूण तापमानाचा समतोल राखते.

आपण देहाचे साधन वापरून जिद्दीच्या जळणाऱ्या तेजाची निर्मिती प्रयत्नांनी करत रहावी. बाहेरील जगाशी आणि आतल्या जगाशी समतोल साधावा..

मनावरची काजळी नित्य काढत रहावी.

(काजळी हा शब्दच जणू प्रश्न विचारतोय..की काचेवरील जमलेल्या काजळीतून जर प्रकाश बाहेर जाणार नसेल तर तू का जळी ? का जळतो आहेस?) 

देहाचा कंदील विधात्याने इथे वापरण्यासाठी.. दिलाय.पण एक दिवस इंधन संपेल.

त्याने देताना जितका स्वच्छ, नीट दिला होता तसाच त्याला परत द्यायला हवा ना.

बाकी आयुष्यभर आपण जळताना दिलेल्या प्रकाशाचे आणि काजळीचे सुद्धा रेकॉर्डस तो ठेवतो आहे ...त्याच्या दैनंदिनीत.

कदाचित तेच आकाशिक रेकॉर्डस असावेत.

लेखन: मुकुंद इंगळे