Monday, August 19, 2024

तुम जो मिल गये हो...एक प्रवाह

तुम जो मिल गये हो

कातळाच्या आत जिथे प्रकाशाचे किरण सुद्धा पोहोचत नाहीत अशा ठिकाणी न दिसणाऱ्या झऱ्यातून थेंब थेंब सुर टपटपत असतात ...ते वाहू लागतात त्या क्षणी एका नदीचा जन्म होतो.ते ठिकाण दिसत नसते..ती जागा नेमकी आहे सुरस्वी मदन मोहन यांच्या अथांग,अनंत सुरावटीनी व्यापलेल्या मनात कुठेतरी. या थेंबांनी हलकेच वाजणारी सुरावट...सुरू होते सुंदर आवर्तनाच्या प्रवाहाने..ती या गान प्रवाहाला वाहतं करते.आणि प्रवाहाचे ओढा नंतर नदी असे प्रवाहित प्रत्यंतर झाल्याचे फक्त आपल्या जाणिवेला समजते...

आणि आपली समाधी भंग न करता त्यात रफीचा मधाळ आवाज ऐकू येतो...

तुम जो मिल गये हो..

पुन्हा चार थेंबाची सुरावट..

तो ये लगता है...

के  जहाँ मिल गया...ऐकताना एक परिपूर्ण..प्रसन्न आपल्याच नादात,लयीत वाहणारी नदी, पार्श्वसंगीतातून आपल्या मनात वाहू लागते.

एक भटके हुवे राही को, कारवाँ मिल गया...

वाहताना वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या दगड पाषणांना रफीच्या आवाजातील चढ उतारांनी अभिषिक्त करत पुढे जात असतो..आणि एक pause... तो खास आधीचे प्रवाह रूप क्षणभर आठवण्यासाठी घेतलेला..आणि सोबत सुरू होते मेघगर्जना आणि प्रचंड सुंदर पाऊस...जो शेवट पर्यंत आपल्याही मनाला चिंब भिजवत रहातो.

पुन्हा वाहणे सुरू होते

तुम जो....

पुढे 

बैठो ना दूर हमसे..मधील पहिले गायलेले "दूर" आणि नंतर गातानाचे "दूर" आपल्याला रफीच्या आणखी "जवळ" नेते आणि त्या प्रवाहात सोबत घेऊन जाते आपल्या अस्तित्वासहित.

एका थेंबाने सुरू केलेल्या प्रवाहाला, कारवाँला आता "आसमाँ" मिळत असतो.

रफीचे हमिंग प्रवाहाची दिशा बदलल्याचे सूचित करते.वेग आणि आवेग वाढू लागतात आणि लय वाढते. आपली घालमेल वाढते वाढते..आणि एकदम सारं काही शांत होतं.

समुद्राच्या लाटा ढगांच्या गडगडाटात किनाऱ्यावर आदळत असताना दिसतात ..अन् फक्त दोन ओळींसाठी लता नावाची लाट आपल्यावर आदळते आणि अनावर सुखात पुन्हा भिजवून जाते.

पण पुन्हा प्रवाह मूळ लयीत येतो.

तुम क्या जानो तुम क्या हो... असं विचारणाऱ्या जलौघाला स्वागतार्ह सोबत मिळालेली असते.

पुन्हा रफीचे हमिंग... आणि वाहण्याची दिशा बदलते..लय वाढते.जणू डोंगरउतारा वरून पाणी बेधुंद सुसाट वाहते आहे.

नव्या आयुष्याची दिशा सापडल्यावर " कारवाँ मिल गया" तल्या गया वर अप्रतिम सुंदर लकेर घेऊन रफी आपल्याला तुडूंब आनंदात भिजवून गात रहातो.

पाऊस कोसळतच रहातो.

गाणं संपतच नाही...रफी लता कानात ऐकू येतच रहातात...आपल्या श्वासात भिनुन...स्पंदनात एकच लय शब्दरूप होऊन ऐकू येते...

तुम जो मिल गये हो

तो ये लगता हैं

के जहाँ मिल गया

लेखन: मुकुंद इंगळे 




No comments:

Post a Comment