Tuesday, May 18, 2021

 

तू ...कोण?

    अजूनही अधूमधून दिसतेस मला तू..अजूनही आपली ओळख नाही 

झालेली...पुढे होईल की नाही देव जाणे.

१९७६..पावसाळा सुरु होत होता. कॉलेज नुकतंच सुरु झालं होत. अजून 

सर्व मुली पाहूनही नव्हत्या झाल्या ..आणि  एका सकाळी तू वर्गात 

आलीस. अगदी फ्रेश तयार झालेला मित्रांचा ग्रुप, तुझा अतिशय फ्रेश,

प्रसन्न चेहरा पाहून खलास झाला. गोरा रंग म्हणजे संगमरवर हे तुला 

पाहताक्षणी पटलं .नितळ चेहरा, धारदार नाक आणि जबरदस्त डोळे..

गुलाबी काड्यांच्या चष्म्यातूनही किंचीतशी हिरवट झाक दाखवणारे.. 

नियमानुसार तुझ्या जाण्यायेण्यावर वेळा ठरू लागल्या. तू ज्या तासाला 

बंक मारायाचीस तेव्हा आम्ही पण बाहेर असायचो. आम्ही म्हणजे 

आणखीही काही जण होते ...आमच्यासारखे पण स्वतंत्र निरिक्षक.. 

आमच्या ग्रूपव्यतिरिक्त .

    आणि एके दिवशी, साधारण महिना दोन महिन्यांनी तू दिसलीस 

त्याच्याबरोबर. कृश म्हणावी अशी शरीरयष्टी..डोळ्यावर येणारे केस ...

तू नेमकं काय पाहिलंस 

त्याच्यात ते तुलाच ठाऊक. तो पण होता आमच्याच वर्गात. मधल्या 

दिवसांनी जादू केली तुम्हा दोघांवर. पण जोडी मस्त जमली. आमच्या 

चडफडण्याचा काहीही उपयोग झाला नाही. एकदा तुमच जमल्यावर 

नावगाव जाणून घेण्याची उत्सुकताच संपली.

मग मात्र तुम्ही दोघे नियमित दिसु लागलात एकमेकांसोबत...एकमेकांत 

गुंतुन गेला होतात कधी पायऱ्यांवर तर कधी लायब्ररी मध्ये, कॉलेजच्या 

स्नेहसमेंलनाच्या कार्यक्रमात ..वर्गात पण असे बसायचात की एकमेकांना 

खाणाखुणा करू शकाल.

    चार वर्षे गेली. पदवी मिळाली आणि पोटार्थी नोकरी पण मिळाली. 

नोकरीसाठी मुबंई गाठली. बाकी पुन्हा कुणी भेटण्याची शक्यता नव्हतीच. 

दहा दिशांना उडून गेलेले पक्षी आपण. काही काळ एकत्र होतो. तेही 

बिनओळखीचे. हे असं खूपदा होतं. त्यात काय.. आता कोण भेटणार परत. 

जे मित्र झाले ते राहणार. तेच तेव्हढे भेटत राहणार. काळाच्या कसोटीवर 

माणसं संबंध घासून घेत असतात. जे राहतात ते बावनकशी समजले तरी 

जातात.

    चार वर्षाचा कॉलेजचा काळ आला आणि अपरिचितासारखा निघून गेला. 

आता खरी जिंदगी सुरु झाली होती. साधारण दीड वर्षाने तुम्ही दोघेही मला 

दिसलात.आणि अधूनमधून शनिवारी रविवारी संध्याकाळी दिसतच राहिलात. 

माझ्या घराच्या थोडं आधी ५ मिनिटे आधी अंतरावर एका इमारतीत तुम्ही 

भाड्याने जागा घेतली होती.   

    एकदा दिसलात असेच आणि लक्षात आल की तुझी चाल मंदावलीय. 

पोटातला भार वाढू लागलाय. आणि तुझ्या चेहऱ्यावर आणखी तेज आले. 

तो तुझी खूप काळजी घेताना दिसायचा. सामान आणताना तुला हाती काही 

घेऊ द्यायचा नाही.माझ्या काही सेकंदाच्या निरिक्षणात इतके लक्षात यायचे तर प्रत्यक्षात तो खूपच काळजी घेत असेल तुझी. नंतर तू गेली असशील माहेरी कारण आता तो 

एकटाच दिसायचा अधून मधून.

    खूप दिवसांनी तू पण दिसलीस आणि परत दिसू लागलात कधी तुम्ही 

दोघे कधी तुम्ही तिघे. नाही म्हटलं तरी थोडास बाळसं तू पण धरलं होतस.

काळ वहावत गेला. सुखी समाधानी संसाराचे साधारण आठवे किवा नववे वर्ष 

असेल कदाचित. आणि अचानक कुणीतरी सांगितले .. बहुधा कामवाल्या बाईने ..

की त्या इमारतीतील  कुणीतरी हृदयविकाराच्या झटक्याने गेले. कोण याचं 

उत्तर ‘तो’ हे अनपेक्षितपणे खूप उशिरा मिळालं. आणि खूप दिवसांनी तू 

दिसलीस. एकटीच. हातात सामानाची पिशवी. गोऱ्या हातावर पिशवीचे बंद 

जिथे काचले होते तिथे लाल चट्टा उठलेला. आणि चेहऱ्यावर उदास भाव, 

सोबती अचानक निघून जाण्याने भांबावलेली, कदाचित हे मलाच जाणवलं 

असेल. तुझ्या डोळ्यात त्याची आठवण मला तेव्हाही दिसत होती.

काळ वहातच होता. तू दिसायचीस अधून मधून, मोठ्या होत जाणाऱ्या 

लेकासोबत. त्याच्यामागे..  सर्व वेदना गिळून, तू छान सांभाळला असावास 

संसार ...शिकवलं असशील लेकाला. सांगितलं असशील त्याला त्याच्या 

स्वप्नांबद्दल. सगळं मनातलं दु:ख गिळून. खूप हिमतीने जगते आहेस तू.

परवा तू अचानक एका दुकानात लेकासोबत दिसलीस आणि हे सगळं  

सिनेमासारखं समोर उभं राहिलं.

    बघता बघता, छिद्र पडलेल्या पिशवीतून अजाणतेपणे सांडावा तसा 

बर्‍याच वर्षांचा काळ सांडत गेला.  काय गंमत आहे ना. जर उद्या 

मी तुला भेटून हे सगळ सांगितलं तर तू खलासच होशील. माणसाचं माणसाशी 

काय असतं नातं ? तुझ्या अख्या आयुष्याच्या वाटचालीचा मी खुप लांबचा 

साक्षीदार आहे असं कसं म्हणणार मी. जिचं नाव गाव माहित नाही, 

ज्याचे नाव गाव माहित नाही ते मला अपरिचित वाटत नाहीत. 

    असं असू शकतं? त्यांचं सुखदु:ख देखील... दु:खाला अंतर नाही ‘अंतर’ 

लागते हेच खरं. पण तू न बोलता खूप शिकवलंस. तुझ्या चेहऱ्यावरचे ठाम 

भाव तुझ्या आयुष्याला सामोरे कसे जावे हेच सांगतात.. डोळ्यात जिद्द तेव्हाही दिसत 

होती.

    माहित नाही आपल्या दोघांच्या जाण्या"आधी हे तुला कळेल का...  

आणि कळले तरी तुझी प्रतिक्रिया काय असेल? अथवा कळण्याची गरज पण नाही.  

पण मला मात्र लक्षात येत नाहीय की आपण ओळखीचे की अनोळखी ...की हे 

अनोळखीपण हाच एक दुवा आहे आपल्यातला,

हँटस आँफ टू यु ....परमेश्वर तुला भरभरून आयुष्य देवो.

कथाकार: मुकुंद इंगळे

 

Monday, May 17, 2021

 


Bench mark आयुष्याचा

 

 




मला आठवतंय की

बरेचदा आपण तिथे बसलेले असायचो....

बोलायचोठरवायचो..!

कुणा मैत्रिणीच्या लग्नासाठी काढलेली मेंदी तू दाखवली होतीस एकदा...

त्यावेळेसच चैत्रात तुझ्या हातावरच्या रेषा पण पाहिल्या होत्या ..

एकदा अचानक आलेल्या पावसाने आपल्याला मस्त भिजवले होते...

तुझ्या ओल्या हातावरचे ओघळणारे पाण्याचे  थेंब खूप सुंदर चकाकत होते.

मग बराच काळ आपण भिजतच राहिलो 

एकमेकांत.

 

इथेच तू त्यादिवशी म्हणाली होतीस "आता 

भेटणे शक्य नाहीम्हणून..

जेव्हा आठवणींचा पालापाचोळा आजूबाजूला तसाच पडून होता तेव्हा...

आणि हे सांगताना तू थरथरत्या हाताने माझा अन 

बाकाचा हात घट्ट 

धरून ठेवला होतास..

ग्रीष्म सुरू झाला आणि त्यानंतर ऋतू बदललाच नाही..

मी अनेकदा इथे यायचो त्यानंतर..

तुझे भास आणि स्पर्शाचे आभास निरखत 

बसायचो.

आज संध्याकाळीच आलोय..वसंतवर्षा

शिशिर आणि ग्रीष्म इतका प्रवास झालाय...

दमलो नाही थकवा नाही.. कारण तुझी भेट.!.

हे बघ बाकी साऱ्या हिरव्या सृष्टीत आपल्या 

आठवणींचे हे बाजूला वाढलेले

फुललेले रंगीबेरंगी झाड बघण्यासाठी येतो मी इथे नेहमी.

तटस्थपणे पहात बसतो हे झाड...दुरून..

काहीसे अंतर राखून आणि 

तुला अंतरात राखून..!

आत्ता चुकून आलीस तर लगेच बसू नकोस या बाकावर...आठवणींचा रंग 

अजून ओला आहे..

या रंगीबेरंगी झाडाची खाली इतस्ततः पडलेली रंगीत पाने फुले पाहिलीस ना..

कदाचित पुढच्या काही दिवसात हा बाक पण असाच "रंगुनजाईल.. 

रंगीत पानेफुलें त्यावरती गळून पडण्याइतके हे झाड पण वाढत राहील.

मी इथेच असेंन एकटा..या बाकासारखा..

फक्त "रंगूनगेलेला आणि रंगून "गेलेला"..!

चित्रकथा:  मुकुंद इंगळे



Saturday, May 1, 2021

Anubhav Siddha



अनुभव-सिद्ध

2008 मधे मी कामासाठी सोलापुरला गेलो होतो. दिवसभराचे काम झाल्यावर, पायी हॉटेलवर जाता जाता डावीकडे एक तटबंदी दिसली. उत्सुकतेने मी त्या दिशेने जाणारी गल्ली पकडली आणि पुढे गेलो. पुढे पायवाट लागली. तेव्हाच त्या भागातले दिवे गेल्याचेदेखिल कळले नाही. कारण थोडासा तरी तेव्हा उजेड होता. कंटाळुन विटलेला सुर्य कलला असे नुसते वाटले.6-6.30 चा सुमार एका छोट्या गल्लीतुन निघालेली वाट मला तिथे घेऊन गेली. जेमतेम 5- 7 मिनिटे चालल्यावर लक्षात आलं की अंगावर थेंब पडतायत. बहुतेक सुर्याला उन्हाने घाम आला असेल इतकी गरम हवा अजुनही होती. मी थांबलो एका कुंपणापाश. तिथुन खाली उतरायला घाट होता. मी उतरलो अंधाराने बराच भाग काबीज केला होता. अंधारातच दिसलेल्या पाटीने सांगितले की मी सिद्धिविनायक मंदिरापाशी उभा आहे. काय करुया ? असेच पुढे जाउ या की माघारी फिरुया.. शेवटी त्या वातावरणाच्या प्रेमात पडल्यामुळे पुढे जाण्याचे ठरवले. आणि निघालो. ही वाट समोरच्या तलावाच्या काठाकाठाने जातेय इतकाच मी अंदाज केला. एका ठिकाणी वाट उतरली आणि छान उतरत जाणार्‍या पायर्‍या लागल्या..काठाशी गणेश मंदिर..आत चार डोकी आणि वरुन पडणारा पाऊस फक्त बोलतोय. आणि समोर अथांग असा सिद्धेश्वराचा तलाव. थोड्या गार वार्‍याच्या झुळुका जाणवु लागल्यात. तलावाभोवती झाडांनी अंधाराची तटबंदी उभी केली आहे. गुढ.. अतिशय आनंदमय वातावरण.

पाऊस कधी थांबणार.. माहित नाही. इथुन कधी निघणार ...माहित नाही. हा आनंद किती वेळ? जाऊ दे.. विचार कशाला करायचा. Just enjoy. बाजुला एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी एक शिवलिंग होतं.ते पण माझ्या सोबत हे क्षण enjoy करत बसलं होतं न जाणो किती वर्षांपासुन.

पाऊस थोडा कमी झाल्यावर मी पुढे निघालो. गजाननाच्या दर्शनाने “शरणमात्र” झालेलं मन अवचित सावध झालं.डावीकडे तलावाकाठचे कुंपण आणि उजवीकडे एक भग्न विशाल तटबंदी यामधुन जाणारी वाट. नवे शहर नवे लोक त्यात काहीही माहिती नसताना केवळ अंदाजाने कुतुहलापोटी चाललेली वाटचाल. अंधार वाढला.  अंधारात पुढे जावे का या वाटेने की मागे फिरावे? तितक्यात कुणीतरी समोरुन येताना दिसले. देवच पावला. त्याला थांबवुन विचारले की बाबा जाते का ही वाट पुढे... तो म्हणाला हो..निर्धास्त जा. मी तिकडुनच आलोय. आयुष्य पण असंच आहे.. ना वाट ओळखीची ना वाट दाखवणारा.

तसाच पुढे गेलो. तटबंदीच्या सावल्यादेखिल अंधाराने आता गिळल्या होत्या. भग्नावशेषानां इतिहास नसतो असते ते फक्त आपल्यापुरते वर्तमान. काही शे वर्षांपुर्वीही काळाचा असाच कवडसा त्यावरुन फिरला आणि त्या क्षणाचा फक्त इतिहास झाला. खरे तर आधीचा आणि नंतरचा.. दोन्ही वर्तमानच.

वाट संपत नव्हती. इकडुन तिकडे वाकडी पळत, मला नादावत होती.

अचानक टाळ्यांचा आवाज ऐकु आला.समोरुन कुणीतरी येत असल्याची चाहुल लागली पण वळणामुळे कळेना. एक जण आपल्याच नादात टाळ्या वाजवत येत होता आणि त्याच्यामागे त्याची माय.

नादावणारी वाट अखेरीस संपली आणि समोर पाहतो तर सिद्धेश्वर मंदिराकडे जाणार्‍या दरवाजासमोर मी उभा होतो. आत जाऊन दर्शन घेणे ही फक्त एक औपचारीकता होती.

इतक्यात दिवे आले. अचानक तलावात प्रकाशाचे कारंजे तरंगु लागले. त्या दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले मंदिर आणि माझे मन.  आधीच उल्हसित झालेले मन आता भरुन पावले. “त्याचे” खरे दर्शन तर मला या क्षणीच झाले होते.

भरुन आलेली पावले फक्त सोबत घेऊन मी निघालो.. पुढे आलो. पण “ते” तिथेच आहे..त्या पावसात..त्या वार्‍यात ..त्या नीरवतेत त्या प्रकाशाने उजळलेल्या आकारात आणि सुंदर अंधारातल्या निराकारात. .. कधी भेटलंच तुम्हांला तर एकच करा. माझ्या त्या मनाला परत नका आणु.तिथेच राहु दे ते.

आयुष्यभर मनात साठवुन ठेवावी अशी एक अर्ध्या पाऊण तासाच्या वाटचालीने समृद्ध झालेली संध्याकाळ मला सोलापुरमधल्या वास्तव्याने दिली आहे.   

मुकुंद इंगळे