प्रकाशाच्या सावल्या
सगळीकडे अनामिक अथांग अंधार पसरला आहे.आत आणि बाहेर विश्र्वामध्ये..
आत पाहिले तरच बाहेरच्या अंधाराच्या आणि स्वतःच्या मनाच्या अस्तित्वाची जाणीव होते.
असंख्य आकाशगंगा,ग्रह तारे यांनी व्यापलेली अगणित विश्वे असतील...तितकीच मनात आहेत..अंधाराने जोडली गेलेली...
आणि जिथे सूर्य आहेत तिथे फक्त प्रकाश निर्माण होतो आहे..
कधी बारा राशीतून फिरताना तर कधी बारा महिन्यांची तावदाने असलेल्या माझ्या मनात राहताना.
सूर्याचा प्रकाश जिथे पोहोचतो तिथून तो परावर्तित होतो..काही कवडसे मनापर्यंत देखील येतात आणि त्यांच्या क्षमतेएवढाच उजेड उजळतो मनाला.
न उजळलेला असिमित अंधार माझी क्षमता आहे... मनाचे सर्व कोपरे उजळवण्याची आस कुतूहलाच्या अगणित छिद्रांवर अवलंबून आहे ज्यातून जिद्दीचे झोत आतवर पोहोचतात....आणि सावल्यांची पण जाणीव करून देतात.
अंधार आणि प्रकाशाच्या खेळात तयार होणाऱ्या काळाच्या सावल्यांमधेच आत मी आणि बाहेर विश्व..दोघेही रमून जातो...तितकीच असते माझ्या अस्तित्वाची जाणीव...आणि माझ्यापुरती विश्वाची जाणीव.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment