चित्र वेध (चित्र सौजन्य:श्री प्रकाश पिटकर)
थेंब अस्तित्वाचा
सुंदर पावसाळी हवा आहे...हिरव्यागार रमणीय परिसरात...पण जंगलात दूर कुठेतरी..कधीतरी.. एका डोंगराच्या उतरंडीवर रुजलेले हे झाड..त्याची नाजूक फांदी आणि त्या नाजूक फांदीवर चार फुलांना चैतन्य देत ओघळणारा सुंदर थेंब..."या" नेमक्या क्षणी टिपलेला...मी.
खूप उंचीवरून ..ढगातून मी पावसाचा होऊन खाली आलो.आम्ही खूप जण होतो. लंपनच्या (संदर्भ वनवास: लेखक प्रकाश संत)च्या भाषेत....साडे सत्तावन कोटी थेंब होतो. वेगाने वेड्यासारखे फक्त आयुष्यभर वहात राहिलो. झाडांचे बुंधे,विविध आकारांचे दगड,कातळ ..कधी धबधबे होऊन कधी नदी होऊन तर कधी ओढा.
असंच वाहताना या झाडावर आलो... वाहणे संपून ओघळणे सुरू झाले.पुढच्या क्षणी काय? पुनर्जन्म की परत वहात राहणे.
नीट विचार केला तर लक्षात येईल..मानवी आयुष्याचा प्रवास या थेंबाने केलेला आहे..आयुष्यभर चारी दिशांना चैतन्य देऊन प्रवाहित राहिला आणि आता "तो" क्षण आलाय...
मातीत पडला तर झिरपून जाईल...उन्हात एक क्षण चमकून वाफ होऊन जाईल... न जाणो खाली डोह असला तर त्या पाण्याशी एकरूप होऊन जाईल...जे काही होईल ते पुन्हा नवे अस्तित्व धारण करण्यासाठीच.
थेंबात चैतन्य असते. चैतन्याचा कधी लोप होत नाही.
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment