Sunday, April 7, 2024

उदबत्तीचे घर

चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)

उदबत्तीचे घर

हे एक घर आहे जे प्रत्येक घरात असतंच.त्यात राहणारा प्रत्येक जण मौनात स्वच्छंद... सुवासात फक्त जळत असतो.घराची अवस्था कधी कधी बदलते..परिस्थितीनुसार.कधी अर्धा बटाटा, केळी तर कधी शोभिवंत वस्तू...ज्यात तिघांच्या एकत्र जळण्याची सोय असते.तर कधी चांदीचे बनलेले एका उदबत्तीचा सोय असलेले उदबत्तीचे घर.लावली उदबत्ती की जळल्यानंतर उरलेली राख कधी अंगारा म्हणून मस्तकी लावायची तर कधी फेकून द्यायची..घर स्वच्छ धुवून घ्यायचे नव्या उदबत्ती साठी.

आपला जन्म होतो त्याक्षणी त्या घराचे रूपांतर उदबत्तीच्या घरात होते.आई आणि वडील या दोन उदबत्त्या अडकवून , खोचून घेतात स्वतःला कर्तव्याच्या छिद्रात.एकदाच काय ते त्यांचे आयुष्य हेलकावते...निसर्गदत्त मिळालेल्या त्या कोनाला पत्करून..आपल्या आयुष्याला सुवास यावा म्हणून मंद .. नि:शब्द फक्त जळत राहतात...त्यांच्या आपल्याप्रती असलेल्या लगडलेल्या प्रेमाच्या जाणिवेची राख होईपर्यंत.मग एक वेळ अशी येते की जळण्यासारखं काही उरत नाही.उरते फक्त काडी...सहज असा काडीमात्र उपयोग नसलेली. हे सगळं घडत असताना लक्षात येत नाही की आपण पण आता उदबत्त्या झालो आहोत. नि:स्वार्थी जाळण्यासाठी तयार.

महत्वाचे हे आहे की उदबत्ती चेतवण्यासाठी काडेपेटीची काडी काडेपेटीवर घासावी लागते.नुसत्या उदबत्तीने दुसरी उदबत्ती पेटवता येत नाही.

काडेपेटी म्हणजे हे जग..समाज... आतील काड्या ही आपल्या आजूबाजूची माणसं...ओळखीची किंवा अनोळखी.ती जळायला तयार असतात...अनंत दिवे चेतवत असतात.कळत नकळत आपल्यावर प्रभाव टाकत असतात.अनेकदा काड्या नीट पेटत नाहीत...तेव्हा काडेपेटी वायाही जाते.शाळेतले शिक्षक,कॉलेज मधील प्राध्यापक...आपले मित्र मैत्रिणी..सहकारी...नातेवाईक.. आपलं सारं भावविश्व...आपल्याला एक प्रभावी सुगंध देते आणि एक उदबत्ती तेव्हा दीर्घकाळ जळण्यासाठी सक्षम होते.

एक नवी उदबत्ती पुन्हा जळणार असते आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उजळणार असते.

लेखन:मुकुंद इंगळे 


No comments:

Post a Comment