चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
रिडेव्हलपमेंट
सध्या पुनर्विकासाचे कितीतरी प्रकल्प येता जाता दिसतात.इमारतीला ३५-४०वर्षे झाली की पुनर्विकास करावा लागतो...सध्याचे रहिवासी तात्पुरते स्थलांतर करतात आणि मग ४-५ वर्षात नवी बहुमजली सुसज्ज इमारत तयार होते.मधल्या काळात साईट वर सभोवती लावलेले निळ्या रंगाचे पत्रे,लहान मोठे काँक्रीटचे मिक्सर,राबीट आणि प्रचंड धूळ.. एवढ्याच गोष्टी दिसत असतात.
इमारत जुनी झालेली असते,सतत दुरुस्तीची कामे निघतात...त्यामुळे पुनर्विकासाचा निर्णय घ्यावा लागतो.त्यालाही दोन पर्याय असतात...कुठल्यातरी बिल्डरकडून नवी इमारत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बांधून घेणे किंवा स्वयंपुनर्विकास करणे.
केवळ जुनी झाली म्हणून एखादी इमारत पुनर्विकसित करावी लागते.
आपलं मन आपल्यासोबत जन्माला येतं.. तितकंच दिवसागणिक वृद्ध होत जातं...त्याचां पुनर्विकास नको का करायला?
मनाच्या अशा साईटवर जुन्या विचारांचे राबिट सगळीकडे विखरून पडलेले,नव्या विचारांचे काँक्रिट मिक्सर सुरूच आहेत...मनात अनेक इमले चढणार तो भार सहन व्हावा म्हणून खोलवर पाया भरावा लागणार.नव्या मनात राहणार नवे विचार..तेच रहिवासी.मात्र विचार मनोवेगे कुठेही जाऊ शकत असल्याने लिफ्टची सोय नसली तरी चालेल.पार्किंगची मात्र हवी..कधी कधी आपल्याला अग्रक्रमानुसार त्यांना काही काळ पार्क करून ठेवावे लागेल...म्हणून पार्किंग हवं.
पण खरं तर मनाला अशा प्रकारच्या पुनर्विकासाची अजिबात गरज नसते...ते स्वतःहुन अद्ययावत होत असते.पालक गुरुजनांच्या कष्टांमुळे पाया नेहमीच भक्कम असतो.तात्पुरत्या विचारांचे भाडेकरू जास्त दिवस टिकत नाहीत...मात्र सण,उत्सव,परंपरा या सांस्कृतिक सार्वजनिक सोहळ्यात कायमचे उत्साही रहिवासी भाग घेतात.
अनुभवांचे मजले काळानुरूप चढत रहातात त्यामळे दृष्टीच्या बाल्कनीज मधून दिसणाऱ्या दृश्याचा कक्षा रुंदावतात.छंदांच्या उद्यानात प्रयत्नांच्या शोभिवंत प्रांगणात लावलेले गायन,वादन,चित्रकला इत्यादी वृक्ष जोमाने बहरतात.मनातले वातावरण नित्य ताजे ठेवतात.
मन म्हणजे एखादी जीर्ण होत जाणारी इमारत नव्हे..तर परमेश्वराने वेरूळ मधले, एका दगडात वरून कोरत आणलेले नक्षीदार,कलात्मक कैलासनाथ लेणे आहे...ते पुरातन होत नाही पण श्र्वासासोबत नित्य चिरंतन असते.
त्याची रि-डेव्हलपमेंट प्रत्येक क्षणी होत असते.
लेखन: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment